Sunday, March 31, 2024

व्हायोलीन वादनाचे अप्रतिम सादरीकरण..

गजाननबुवा जोशी यांच्या व्हायोलीन परंपरेचा उत्तम आविष्कार चारुशीला गोसावी यांच्या वादनातून साकारला... डॉ. विकास कशाळकर
गजाननबुवा जोशी यांच्याकडे चाळीस वर्षांपूर्वी ज्या श्री रागाने सुरवात केली त्या रागाचे अप्रतिम सादरीकरण करून चारुशीला गोसावी यांनी आपल्याला पुनः प्रत्ययचा आनंद दिल्याची भावना ज्येष्ठ गायन गुरू आणि अभ्यासक डॉ. विकास कशाळकर यांनी एस एम जोशी सभागृहात व्यक्त केली. संगीत साधनेची चाळीस वर्षे या निमित्ताने पुण्याच्या व्हायोलीन वादक चारुशीला गोसावी यांनी शास्त्रीय आणि सुगम व्हायोलीन वादनाची मैफल व्हायोलीन गाते तेंव्हा..या नावाने रविवारी ३१ मार्च २४ ला रसिकांसमोर सादर केली.
यावेळी चारुशीला गोसावी यांनी श्री रागाने शास्त्रीय व्हायोलीन वादन करून त्यामुळे भारावून जाऊन डॉ. विकास कशाळकर यांनी त्यांच्या वादनात दाखविलेले स्वरांचे दर्जे आणि लयीचे प्रभुत्व त्यांच्या वादनात होते याबद्दल आपल्या बोलण्यात कशाळकर यांनी चारुशीला गोसावी यांच्या विशुद्ध वादनाची दाद देऊन..आजकाल कलाकार गॅलरी साठी वाजवितात .पण गोसावी यांनी केलेले वादन स्वतः साठी होते म्हणून ते अधिक दर्जेदार होते याची कबुली दिली. आणि गजाननबुवांची परंपरा तुम्ही नक्की पुढे न्या ..असे सुचविले. तबला वादक मोहन पारसनीस यांनी कलाकार काय वाजवितो याचे भान ठेऊन चारुशीला गोसावी यांना केलेली साथ मोलाची होती..याबद्दल ज्येष्ठ तबला गुरू पांडुरंग मुखडे यांनी कौतुक केले आणि चारुशीला गोसावी यांनी शास्त्रीय व्हायोलीन वादनात उत्तम तारेवरची कसरत उत्तम स्वर तालात साधली याबद्दल खास शब्दात त्यांनी मनोगतात त्यांची स्तुती केली. स्वरानंदचे प्रकाश भोंडे यांनी चारुशीला यांच्या वक्तशीर आणि अभ्यासू वृत्तीचा उल्लेख करून प्रामाणिक, मेहनत घेऊन कार्यक्रम सादर करते याबद्दल समाधान व्यक्त करून त्यांना पुढील कारकिर्दीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या. पुण्यात अनेक कार्यक्रम सादर होत असताना या व्हायोलीन कार्यक्रमासाठी सभागृह पुरेपूर आनंद घेत रसिकांच्या उपस्थितीने भरलेले होते..
आरंभी शास्त्रीय व्हायोलीन वादनात श्री आणि त्यानंतर किरवाणी रागातली धून सादर करून उपस्थितांची शाबासकी मिळविली.. त्यांना तबला साथ तेव्हढ्याच आत्मीयतेने आणि तयारीने मोहन पारसनीस यांनी केली होती. सुगम संगीतात स्वतःची ओळख व्हायोलीन वाद्यावर करून चारुशीला गोसावी प्रभात समयो पातला, जगी आंधळी मी तुला पाहते, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तर लळा जिव्हाळा सारखे भावपूर्ण अवघड गीत, कारे धरिला सारखी बैठकीची लावणी, नकोस नौके परत फिरू हे गीतरामायणातले आगळे गाणे, पराधीन आहे जगती सारखे अर्थपूर्ण गीत. तर तुझे गीत गाण्यासारखे भावगीत....आणि चारुशीला गोसावी यांची शिष्या वैष्णवी काळे यांनी आईये मेहेरबान..सादर करून रसिकांची पसंती मिळविली.
मग मधुबन मे राधिका सारखे नृत्य..ताल.. लय याला महत्व असणारे लोकप्रिय हिंदी गाणे, पाकिझा मधील ईन्ही लोगोने.. आणि शेवटी हे सुरांनो चंद्र व्हा...ह्या भावपूर्ण गाण्याने आजच्या व्हायोलीन गाते तेंव्हा..या कार्यक्रमाची सांगता झाली.. संपूर्ण कार्यक्रम म्हणजे उत्तम व्हायोलीन वादनाची अवीट मैफल अशी काही रंगत गेली त्याला यथोचित अशा निवेदिका विनया देसाई यांच्या उत्तम शब्दाने.. साथ संगत विनीत तिकोनकर, उद्धव कुंभार आणि आदिती गराडे त्यांच्या कमालीच्या हुशारीने वाजविलेल्या वाद्यातून लाभली.. पंडित भालचंद्र देव यांच्या पत्नी निलाक्षी देव यांच्या हस्ते कलावंताना स्नेह प्रतिक देण्यात आले.. तर रसिकांच्या वतीने आनंद आणि कल्याणी सराफ यांनी गोसावी यांना गुलाबाची परडी देऊन सन्मान केला. रवी मेघावत यांच्या उत्तम ध्वनीव्यवस्थापनामुळे गाणी ऐकण्याचे उत्तम समाधान रसिकांना घेता आले. तीन तास व्हायोलीनची संगत लाभलेल्या रसिकांना चारुशीला गोसावी यांच्या विशुद्ध वादनाची शास्त्रीय आणि सुगम मैफल अनुभवता आली.
- सुभाष इनामदार, पुणे

Sunday, January 28, 2024

ाजदत्त तथा दत्तात्रय अंबादास मायाळू याना पद्मभूषण जाहीर..!

राजा परांजपे यांचेकडून धडे गिरवून ज्यांनी आपल्या उत्तम चित्रपटांनी समाज मनावर उत्तम संस्काराचे बीज रोवले त्या कलावांतच्या उतरत्या वयात या मराठी व्यक्तीचा असा सन्मान केला याचा आम्हा सर्व रसिक..वाचकांना अभिमान वाटतो.. स्वतःचा आगळा ठसा ठेवणारा हा मोठा धेय्यावेडा , तपस्वी माणूस..आपल्या वागण्यातून बोलण्यातून मराठी रसिकांवर छाप पाडत गेला.. त्यांचे चित्रपट आदर्श झाले आणि त्यातून नवे कलावंत..चित्रपट सृष्टीला लाभले.. तंत्राच्या आहारी न जाता अधिकाधिक उत्तम रित्या कथा ताकदीने पोचविण्याचा त्यानी सचोटीने प्रयत्न केला.. अनेक राष्ट्रीय पारितोषिके त्यांच्या चित्रपटांना लाभली..आता पद्मभूषण मिळून त्यांच्या या कारकिर्दीला नवे वलय लाभले आहे.. त्यांना उत्तम आरोग्यपूर्ण आयुष्य यापुढेही लाभावे आणि त्यानी आपले उत्तम शिष्य निर्माण करावेत..हीच आम्हा रसिकांची इच्छा..! राजदत याना आम मानाचा मुजरा..! जय हिंद..जय महाराष्ट्र...! - subhash inamdar, Pune subhashinamdar@gmail.com
राजदत्त जीवन परिचय मूळ नाव दत्तात्रय अंबादास मायाळू, चित्रपटासाठीचे नाव राजदत्त. चित्रपट क्षेत्रातील त्यांचे गुरू राजा परांजपे यांच्या नावातील 'राज 'आणि स्वतःच्या नावातील 'दत्ता' घेऊन राजदत्त झाले . अमरावती जिल्ह्यातील धामणंगाव इथे त्यांचा जन्म झाला. वर्धा येथे जी.एस. कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये बी. कॉम. पर्यंत शिक्षण घेतले. शिशु अवस्थेपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जात. तृतीय वर्ष शिक्षित स्वयंसेवक संघ बंदीच्या काळात २ महिने १८ दिवस कैद भोगली. सत्याग्रहात भाग घेऊन लहानपणा पासून गणेश उत्सव,मेळा,शाळा व कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये नाटकात भूमिका केल्या. त्यांच्या कुसुमाग्रजांचे 'दूरचे दिवे ',आचार्य अत्रे यांचे 'उद्याचा संसार ','साष्टांग नमस्कार'मधील भूमिका चांगल्या झाल्या. विशेषतः 'साष्टांग नमस्कर' मधली कवीची भूमिका खूप छान जमली होती. शिवाय बाळ कोल्हटकरांच्या 'वाहतो ही दुर्वांची जुडी' मध्येही काम केले . सदुभाऊ डांगे नावाचे केरळमधले संघाचे प्रचारक होते. ते नाटिका लिहीत. त्यांच्या सगळ्या नाटिकांमधून राजदत्तांनी भूमिका केल्या. प्रत्यक्ष राजाभाऊ परांजपे यांच्या हस्ते त्यांना पारितोषिकही मिळाले. महाविद्यालयात असतांना दर रविवारी सेवाग्राम जवळच्या गोपुरीतील कृष्ठधाम केंद्रात शुश्रूषा पथकांत सहभागी होत. समाजसेवेची आस आजही त्यांच्या कलाकृतीतून दिसते. सुप्रसिद्ध लेखक ग.त्र्य माडखोलकर यांच्या प्रोत्साहनाने दैनिक तरुण भारत नागपूर येथील 'युनिव्हर्सिटी 'सदरात लिखाण सुरू केले.त्यांच्यातील पत्रकारितेचा हा श्रीगणेशा होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील दैनिक भारत या वृत्तपत्रात नोकरी केली.त्यानंतर मद्रास इथल्या चांदोबा या मुलांच्या मासिकांत संपादकीय विभागात दोन वर्ष काम केले. त्यांची मुलगी भक्ती मायाळू प्रसिद्ध मालिका संकलक आहेत.
चित्रपट कारकीर्द मद्रास इथला कालखंड त्यांच्या जीवनाची दिशा ठरवणारा होता. राजाभाऊ परांजपे मद्रासला चित्रपटासाठी आले असतांना त्यांच्या ओळखींमुळे इथल्या AVMच्या स्टुडिओतून राजदत्त यांना मनसोक्त फिरता आले आणि चित्रपट या क्षेत्राशी त्यांचे नाते जोडले गेले. राजाभाऊ परांजपे यांच्याकडे AVMच्या 'बाप बेटे' चित्रपटादरम्यान उमेदवारी सुरू झाली. जवळ जवळ १३ चित्रपटांसाठी राजाभाऊंचे सहाय्यक म्हणून काम केले. त्यात प्रामुख्याने 'देवघर','जगाच्या पाठीवर','आधी कळस मग पाया ','हा माझा मार्ग एकाला','पाठलाग','पडछाया' इ. चित्रपटांचा उल्लेख करता येईल. १९६७ मध्ये स्वतंत्रपणे चित्रपट दिग्दर्शनाला सुरुवात केली. पहिला चित्रपट 'मधुचंद्र' आणि या पदार्पणातच यांनी एक यशस्वी प्रयोग केला; हिंदीत संगीतकार असलेले एन.दत्ता यांना मराठी चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन करायला लावले. पहिला चित्रपट झाल्यानंतर पुन्हा काहीच काम नाही. अशावेळी भालजी पेंढारकर व लता मंगेशकर यांनी मदत केली आणि चित्रपट तयार झाला - 'घरची राणी'. राजदत्त यांनी या मदतीचे चीज केले. महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आणि मग राजदत्त यांनी मागे वळून पाहिलेच नाही.१९६९ साली 'अपराध'चित्रपटाला पुन्हा एकदा 'राज्य शासनाचा प्रथम पुरस्कार'मिळाला. त्यानंतर सतत २८ चित्रपटाचे दिग्दर्शन केले [२]त्यापैकी ९ चित्रपटांना प्रथम, ३ चित्रपटांना द्वितीय, २ चित्रपटांना तृतीय आणि एका चित्रपटाला विशेष असे राज्य शासनाचे एकूण १४ पुरस्कार मिळाले आहेत. एवढे पुरस्कार मिळवणारे मराठीतले 'राजदत्त' हे एकमेव दिग्दर्शक आहेत. राष्ट्रीय पातळीवरही राजदत्त यांची कामगिरी अशीच आहे. त्यांच्या 'शापित','पुढचं पाऊल' आणि 'सर्जा' या तीन चित्रपटांना 'रजतकमळ'मिळालंय . चित्रपटसृष्टीतला मानाचा फिल्मफेर पुरस्कारही राजदत्त यांना मिळाला.
राजदत्त यांनी प्रामुख्याने राष्ट्रभक्ती, सामाजिक प्रश्नांची तळमळ आणि चिंतनाला चालना देणारे चित्रपट दिग्दर्शित केले म्हणूनच अनेक विषय प्रेक्षकांपर्यंत पोहचले. संत गाडगेबाबा यांच्या जीवनावरचा 'देवकी नंदन गोपाला' हा चित्रपट महाराष्ट्रबरोबर कर्नाटक, तामिळनाडू मध्येही प्रदर्शित झाला. इतकेच नव्हे तर इंग्लंड आणि अमेरिकेतही प्रदर्शित झाला.ताश्कंद फेस्टिव्हलमध्येही तो दाखवण्यात आला.'शापित' चित्रपटासाठी रशियन कौन्सिलने त्यांचा सत्कार केला. राजदत्त यांच्या तीन चित्रपटांना ताश्कंद, व्हेनिस आणि कॉर्क फेस्टिव्हलमध्ये स्थान मिळाले. राजदत्त यांनी 'इरिया' हा हिंदी चित्रपटही केला. त्यात शर्मिला टागोर, मार्क जुबेर यांच्या भूमिका होत्या .

Thursday, January 25, 2024

राजदत्त तथा दत्ता मायाळू याना पद्मभूषण

राजा परांजपे यांचेकडून धडे गिरवून ज्यांनी आपल्या उत्तम चित्रपटांनी समाज मनावर उत्तम संस्काराचे बीज रोवले त्या कलावांतच्या उतरत्या वयात या मराठी व्यक्तीचा असा सन्मान केला याचा आम्हा सर्व रसिक..वाचकांना अभिमान वाटतो.. स्वतःचा आगळा ठसा ठेवणारा हा मोठा धेय्यावेडा , तपस्वी माणूस..आपल्या वागण्यातून बोलण्यातून मराठी रसिकांवर छाप पाडत गेला.. त्यांचे चित्रपट आदर्श झाले आणि त्यातून नवे कलावंत..चित्रपट सृष्टीला लाभले.. तंत्राच्या आहारी न जाता अधिकाधिक उत्तम रित्या कथा ताकदीने पोचविण्याचा त्यानी सचोटीने प्रयत्न केला.. अनेक राष्ट्रीय पारितोषिके त्यांच्या चित्रपटांना लाभली..आता पद्मभूषण मिळून त्यांच्या या कारकिर्दीला नवे वलय लाभले आहे.. त्यांना उत्तम आरोग्यपूर्ण आयुष्य यापुढेही लाभावे आणि त्यानी आपले उत्तम शिष्य निर्माण करावेत..हीच आम्हा रसिकांची इच्छा..! राजदत याना आम मानाचा मुजरा..! जय हिंद..जय महाराष्ट्र...! - सुभाष इनामदार, पुणे subhashinamdar@gmail.com राजदत्त जीवन परिचय मूळ नाव दत्तात्रय अंबादास मायाळू, चित्रपटासाठीचे नाव राजदत्त. चित्रपट क्षेत्रातील त्यांचे गुरू राजा परांजपे यांच्या नावातील 'राज 'आणि स्वतःच्या नावातील 'दत्ता' घेऊन राजदत्त झाले . अमरावती जिल्ह्यातील धामणंगाव इथे त्यांचा जन्म झाला. वर्धा येथे जी.एस. कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये बी. कॉम. पर्यंत शिक्षण घेतले. शिशु अवस्थेपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जात. तृतीय वर्ष शिक्षित स्वयंसेवक संघ बंदीच्या काळात २ महिने १८ दिवस कैद भोगली. सत्याग्रहात भाग घेऊन लहानपणा पासून गणेश उत्सव,मेळा,शाळा व कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये नाटकात भूमिका केल्या. त्यांच्या कुसुमाग्रजांचे 'दूरचे दिवे ',आचार्य अत्रे यांचे 'उद्याचा संसार ','साष्टांग नमस्कार'मधील भूमिका चांगल्या झाल्या. विशेषतः 'साष्टांग नमस्कर' मधली कवीची भूमिका खूप छान जमली होती. शिवाय बाळ कोल्हटकरांच्या 'वाहतो ही दुर्वांची जुडी' मध्येही काम केले . सदुभाऊ डांगे नावाचे केरळमधले संघाचे प्रचारक होते. ते नाटिका लिहीत. त्यांच्या सगळ्या नाटिकांमधून राजदत्तांनी भूमिका केल्या. प्रत्यक्ष राजाभाऊ परांजपे यांच्या हस्ते त्यांना पारितोषिकही मिळाले. महाविद्यालयात असतांना दर रविवारी सेवाग्राम जवळच्या गोपुरीतील कृष्ठधाम केंद्रात शुश्रूषा पथकांत सहभागी होत. समाजसेवेची आस आजही त्यांच्या कलाकृतीतून दिसते. सुप्रसिद्ध लेखक ग.त्र्य माडखोलकर यांच्या प्रोत्साहनाने दैनिक तरुण भारत नागपूर येथील 'युनिव्हर्सिटी 'सदरात लिखाण सुरू केले.त्यांच्यातील पत्रकारितेचा हा श्रीगणेशा होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील दैनिक भारत या वृत्तपत्रात नोकरी केली.त्यानंतर मद्रास इथल्या चांदोबा या मुलांच्या मासिकांत संपादकीय विभागात दोन वर्ष काम केले. त्यांची मुलगी भक्ती मायाळू प्रसिद्ध मालिका संकलक आहेत. चित्रपट कारकीर्द मद्रास इथला कालखंड त्यांच्या जीवनाची दिशा ठरवणारा होता. राजाभाऊ परांजपे मद्रासला चित्रपटासाठी आले असतांना त्यांच्या ओळखींमुळे इथल्या AVMच्या स्टुडिओतून राजदत्त यांना मनसोक्त फिरता आले आणि चित्रपट या क्षेत्राशी त्यांचे नाते जोडले गेले. राजाभाऊ परांजपे यांच्याकडे AVMच्या 'बाप बेटे' चित्रपटादरम्यान उमेदवारी सुरू झाली. जवळ जवळ १३ चित्रपटांसाठी राजाभाऊंचे सहाय्यक म्हणून काम केले. त्यात प्रामुख्याने 'देवघर','जगाच्या पाठीवर','आधी कळस मग पाया ','हा माझा मार्ग एकाला','पाठलाग','पडछाया' इ. चित्रपटांचा उल्लेख करता येईल. १९६७ मध्ये स्वतंत्रपणे चित्रपट दिग्दर्शनाला सुरुवात केली. पहिला चित्रपट 'मधुचंद्र' आणि या पदार्पणातच यांनी एक यशस्वी प्रयोग केला; हिंदीत संगीतकार असलेले एन.दत्ता यांना मराठी चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन करायला लावले. पहिला चित्रपट झाल्यानंतर पुन्हा काहीच काम नाही. अशावेळी भालजी पेंढारकर व लता मंगेशकर यांनी मदत केली आणि चित्रपट तयार झाला - 'घरची राणी'. राजदत्त यांनी या मदतीचे चीज केले. महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आणि मग राजदत्त यांनी मागे वळून पाहिलेच नाही.१९६९ साली 'अपराध'चित्रपटाला पुन्हा एकदा 'राज्य शासनाचा प्रथम पुरस्कार'मिळाला. त्यानंतर सतत २८ चित्रपटाचे दिग्दर्शन केले [२]त्यापैकी ९ चित्रपटांना प्रथम, ३ चित्रपटांना द्वितीय, २ चित्रपटांना तृतीय आणि एका चित्रपटाला विशेष असे राज्य शासनाचे एकूण १४ पुरस्कार मिळाले आहेत. एवढे पुरस्कार मिळवणारे मराठीतले 'राजदत्त' हे एकमेव दिग्दर्शक आहेत. राष्ट्रीय पातळीवरही राजदत्त यांची कामगिरी अशीच आहे. त्यांच्या 'शापित','पुढचं पाऊल' आणि 'सर्जा' या तीन चित्रपटांना 'रजतकमळ'मिळालंय . चित्रपटसृष्टीतला मानाचा फिल्मफेर पुरस्कारही राजदत्त यांना मिळाला. राजदत्त यांनी प्रामुख्याने राष्ट्रभक्ती, सामाजिक प्रश्नांची तळमळ आणि चिंतनाला चालना देणारे चित्रपट दिग्दर्शित केले म्हणूनच अनेक विषय प्रेक्षकांपर्यंत पोहचले. संत गाडगेबाबा यांच्या जीवनावरचा 'देवकी नंदन गोपाला' हा चित्रपट महाराष्ट्रबरोबर कर्नाटक, तामिळनाडू मध्येही प्रदर्शित झाला. इतकेच नव्हे तर इंग्लंड आणि अमेरिकेतही प्रदर्शित झाला.ताश्कंद फेस्टिव्हलमध्येही तो दाखवण्यात आला.'शापित' चित्रपटासाठी रशियन कौन्सिलने त्यांचा सत्कार केला. राजदत्त यांच्या तीन चित्रपटांना ताश्कंद, व्हेनिस आणि कॉर्क फेस्टिव्हलमध्ये स्थान मिळाले. राजदत्त यांनी 'इरिया' हा हिंदी चित्रपटही केला. त्यात शर्मिला टागोर, मार्क जुबेर यांच्या भूमिका होत्या .

Wednesday, January 17, 2024

ओ.पी.नय्यर..आठवणी आणि गाणी

ओंकार प्रसाद नय्यर..अर्थात ओ.पी. नय्यर.. यांच्या गाण्यांनी आणि आठवणीने भारलेली मंगळवार संध्याकाळ..! आपल्या मेलोडियस आणि उडत्या चाली..यातून हिंदी चित्रपटसृष्टीतील या महान संगीतकाराची अनेक गाणी आजही मनावर. आणि ओठावर आहेत.. त्यातलीच काही निवडक गाणी पुण्यात व्हायोलीन मधून अभय आगाशे यांनी तन्मयतेने सादर केली आणि त्यांच्या आयुष्यातील प्रसंगाना अधिक हळुवार बनवून शब्दातून तसेच चित्रातून रसिकांच्या मनात ओ.पी. नय्यर यांचा स्वभाव, त्यांची शिस्त त्यांची शैली आणि त्यांच्या आठवणी प्रकाशचित्रकार आणि उत्तम लेखक सतीश पाकणीकर यांनी पुण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमातून ओ.पी. प्रेमी रसिकांच्या मनात रुजविण्याचे उत्तम कार्य करून नवीन पिढीला या संगीतकाराची ओळख करून दिली. चित्रपट संगीताच्या अभ्यासिका सुलभा तेरणीकर सतीश पाकणीकर यांच्याविषयी माहिती देत त्यांचे नय्यरप्रेम किती आहे याविषयी बोलून त्यांना शुभेच्छा दिल्या.
ओपिंचे संगीत म्हणजे अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा हॅपिनेस इंडेक्स..असा उल्लेख करून सतीश पाकणीकर सांगतात.. बसल्या जागी तुम्हाला उड्या मारायला लावेल असे ते संगीत आहे..मेलोडीयस आणि रिदमकिंग असलेले ओ.पी. हे त्यांना त्यांच्या बरोबर काम केलेले संतूरवादक शिवकुमार शर्मा त्यांचे वर्णन करीत. ओ.पी. नय्यर यांच्या कॉफी टेबल पुस्तकाच्या निमित्ताने सतीश पाकणीकर यांना त्यांचा सहवास लाभला त्यातून ते व्यक्ती म्हणून आणि संगीतकार म्हणून कसे आहेत हे जवळून अनुभवण्याची संधी मिळाली..नय्यर यांच्या जन्मदिवसाच्या निमीत्त विवेक पाध्ये यांच्या सहकार्यातून कार्यक्रम करताना त्या साऱ्या आठवणी त्यानी रसिकांच्या हृदयात कोरल्या. इथे आठवणी आणि गाणी असा अनुभव टिपण्या सारखा होता..म्हणूनच याची दखल घेणे अत्यावश्यक होते .
संगीतकार..एक व्यक्ती म्हणून आणि कलकार म्हणून इतर वादकांना आणि गायकांना कसा मान देतो त्याची उदाहरणे इथे अधिक बोलकी झाली.. पाकणीकर बोलत होते..आठवणी विस्तृत सांगत होते.. गाणी अभय आगाशे आपल्या व्हायोलीनमधून सादर करून शब्द शब्द ..मनात .. स्वरातून बोलते करत होते.. अतुलकुमार उपाध्ये यांचेकडे व्हायोलीनची तालीम घेतलेल्या अभय आगाशे यांनी आपल्या वादनाने गाण्याना अधिक नेटकेपणाने शब्द नसताना बोलके केले.. त्यांना अनुजा आगाशे, प्रसाद जोशी, दिलीप व्यास आणि रोहित साने या सहवादकांच्या उत्तम साथीने गाणे एकाग्रतेने खुलवत होते.. प्रत्येक गाण्याचे सादरीकरण पुनःप्रत्ययाचा आनंद देत होता..
गाणी सादर होताना पडद्यावर ओ.पी. ..चित्रपट, त्यातील कलाकार, आणि गाण्यात वादन केलेले कलावंत खास करून सतीश पाकणीकर यांनी दाखवून त्याचे महत्व अधिक ठळक केले. आइये मेहरबाँ, बाबूजी धीरे चलना, आखों ही आखोमें इशारा हो गया... आवो हुजुर तुमको,छोटासा बालमा, सून सून सून जालिमा, इशोरो इशारोमे.. तुमसा नहीं देखा. पासून दिवाना हुआ बादल पर्यंत सोळा गाण्यांचा नजराणा इथे पेश झाला..
व्हायोलीन या वाद्याची उत्तम पकड ..गाण्यातील नेमकेपणा आणि त्यातले बारकावे अभय आगाशे यांच्या सादरीकरणात स्पष्ट दिसले.. रेकॉर्डिंग साठी आलेल्या वादकांना लगेच पेमेंट करणारे..वेळ पाळणारे..त्यातही देलेला शब्द पाळणारे..पण आयुष्याच्या उत्तरार्धात अधिक खडतर आयुष्य भोगणारे..तरीही आपला आब आणि रुबाब सांभाळत , हिंदी न येताही उर्दू भाषेतून का करणारे उत्तम काव्याची जाण असणारे तसेच कधीही कुणापुढे न झुकणारे ..आपल्या मस्तीत हिंदी चित्रपटसृष्टीत राज्य करणारे महान संगीतकार ओ. पी. नय्यर यांचे उदाहरण आदर्श म्हणून कसे होते..ते या आठवणीतून आणि व्हायोलीन मधून सादर झालेल्या अनुभवातून सिध्द झाले.
कार्यक्रमासाठी हेमंत पाकणीकर आणि रवी केळकर यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले. केवळ ओ.पी. प्रेमींना नव्हे तर हिंदी संगीताचे जाणकार असणाऱ्या रसिकांना असे कार्यक्रम हे आनंद आणि समाधान देतात.. अतिशय अभ्यासपूर्ण असलेल्या या कार्यक्रमाचे पुन्हा विविध गावात सादरीकरण व्हायला हवे आहे.
- सुभाष इनामदार, पुणे subhashinamdar@gmail.com

Saturday, November 4, 2023

संगीतभूषण राम मराठे एक स्मरण

पंडित राम मराठे जन्मशताब्दी निमित्ताने शुक्रवारी पुण्यात गानवर्धन पुणे, यांनी आयोजित केलेली ही अनोखी संगीत मैफल.. राम मराठे यांच्या गायनातील सादरीकरणात असलेल्या भरजरी स्वरांच्या लडा इथे हळुवारणे रसिकांच्या साक्षीने उलगडत गेल्या.. ही अनोखी मैफल राम मराठे यांच्यातल्या कलाकाराचे सर्व बाजूंनी असलेले महानपण ..त्यांची स्वरावरची हुकूमत..त्यातले तेज..अनेक गुरूंकडून घेतलेली विद्या आणि चतुरस्र बुध्दी साऱ्यांचे दर्शन शुक्रवारी एस एम जोशी सभागृहात घडले. जबरदस्त अशी तीक्ष्ण प्रतिभा लाभलेले राम मराठे नादब्रह्म स्वरुपात आजही किती रसिकांच्या मना मनात आहेत याची साक्ष कार्यक्रमातून येणारी दाद यातून बाहेर आली. बैठकीत गाणे आणि नाटकातील गाणे कसे आणि का वेगळे होते याचे मर्म त्यांच्या मुद्रित माध्यमातून उलगडले. त्यांच्या बाबतीतला आठवणींचा खजाना इथे अनेक मान्यवरांच्या प्रतीक्रियेतून कळत गेला. राम मराठे यांनी आपल्या मुलाखतीतून सांगितलेल्या गोष्टी आणि गायकांच्या हुबेहूब केलेल्या नकला.. यातून ते गायक कसे होते याचे नेमके मर्म त्यांच्या स्मृतीला अधिक झळाळी देणारे होते. यात राम मराठे यांच्या चार पिढ्या रसिकांसमोर आल्या.. यात प्रामुख्याने मुकुंद मराठे , भाग्येश मराठे, स्वरांगी मराठे - काळे , आदिश्री पोटे, मृणाल नाटेकर ,राजेंद्र मणेरिकर या त्यांच्या कुटुंबातील आणि परिवारातील कलावंतांचा सहभाग होता. माधव मोडक..तबला आणि लीलाधर चक्रदेव यांची हार्मोनियम संगत कार्यक्रमाला अधिक समर्पक अशीच होती. संजय गोगटे हे बाहेरून ऑर्गन साथ करीत होते. या खरोखरीच संस्मरणीय कार्यक्रमाचे निवेदन स्वाती मराठे.. थिटे यांनी केले होते. - सुभाष इनामदार, पुणे subhashinamdar@gmail.com

Monday, October 23, 2023

एकदा अनुभवल्याच पाहिजेत..

अनवट शांताबाई..
व्हायोलीनचे ते हळवे सूर सायंकाळचे हुरहूर लावणारे स्वर मंचावर वाजत रहातात..आणि त्यातच सुरू होते ..ही वाट दूर जाते.. ह्या सुरावटिकडे आणि शांता जनार्दन शेळके यांच्या जन्म गावपासूनचा प्रवास अभिवाचनातून उलगडला जातो..बालपण..तिथले वातावरण..मनावरचे आईचे ...आज्जीचे संस्कार ..आणि एका ज्येष्ठ कवियत्रीच्या जीवनाचा तो काहीसा उदास वाटणारा अनवट प्रवास वंदना बोकील.. कुलकर्णी यांच्या शब्दात सांगायचे तर त्यांच्याच पुस्तकातून शांताबाई ज्या व्यक्त झाल्या आहेत..त्या हळूहळू आपली कहाणी सांगु लागतात.. अनुराधा जोशी..दिपाली दातार..आणि वंदना बोकील या त्या शब्दातून तर कधी कवितेच्या बोलितून व्यक्त होऊ लागतात.. आणि या साऱ्या प्रवासाला व्हायोलीनच्या पार्श्वसंगीतात आणि साजेशा गाण्याच्या स्वरात अनुप कुलथे त्या वातावरणात घेऊन जातात.. एकूणच रसिक शांताबाई शेळके यांच्या आयुष्यातील एकेक घटना एकाग्रतेने ऐकतात आणि त्या गोष्टीचा मागोवा घेत..त्यांच्या जीवनात एकरूप होऊन जातात..
शांता शेळके यांची गीते मना मनात..घराघरात पोचली पण त्यांच्या कविता तेव्हढ्या पोचल्या नाहीत.. ही खंत त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दूर करून त्यांच्याच पुस्तकातून त्यांनीच लिहलेल्या शब्दांना एकत्र करून वंदना बोकील यांनी आपली अनवट शांताबाई सादर केली..आपल्या आम्ही सुदर्शन रंगमच इथे हा अनुभव घेतला..या कार्यक्रमात सहभागी होऊन रसिकांना त्यात सामील करून वंदना बोकील. कुलकर्णी आम्हाला त्या दिवसात घेऊन गेल्या. शांता शेळके यांच्या मनातील व्यथा आणि त्यांचे ते एकाकी जगणे आणि त्यांच्या मनोव्यथा दर्शविणाऱ्या कविता निवडून लहानपण..घरगुती वातावरण..त्यांची जात.. त्यांचे शिक्षण .. त्यांनी मुंबईत जपलेले नाते आणि कवितेशी त्यांची जमलेली गट्टी सारेच इथे व्यक्त होते.. परिस्थितीच्या भोवऱ्यात सापडली आहे त्याची ही कहाणी.. ओठांवरती थोडे हासू डोळा थोडे पाणी ठेऊन शब्दांच्या जोडीला इथे कविताही बोलक्या होतात..या अभिवाचानात बोलून न बोललेल्या भावनाही मनाला भिडतात त्याचे कारण प्रभावी व्यक्त होणे या सादर करणाऱ्या कलाकारांच्या भूमिकेतून..
त्याची परिणाकारकता इथे ऐकताना तुम्हालाही जाणवेल आणि तुम्ही सहजी त्या वातावरणात सामील होता. शब्दातून व्यक्त झालेल्या ओळीतून त्यांचे जगणे अंगावर येते..आणि आपण ज्या आनंदी आणि मनमोकळ्या भासलेल्या शांताबाई खरोखरीच कोणत्या उदासवाण्या आयुष्यात जगल्या त्याची ओळख होते.. कारुण्याचा स्पर्श या अनवट शांताबाई कार्यक्रमात सतत तुमची पाठ सोडत नाही.. आणि मग शेवटी जेंव्हा असेन मी नसेन मी..ची ओळ येते तेंव्हा पर्यंत हाच आशावाद कायम राहतो..
खरे तर अशा कार्यक्रमावर थोडक्यात व्यक्त होणे ही परीक्षा असते..यासाठी त्यांच्या काही कविता यांचा संदर्भ घ्यायचा मोह टाळून सुदर्शनच्या मंचावर..उत्तम रसजी, वाचकांच्या साक्षीने अनुभवलेल्या शांताबाई..यावर व्यक्त होणे खूप कठीण आहे..तो अनुभव प्रत्यक्ष घेणे हेच उचित होईल. अश्या कार्यक्रमात सहभागी होऊन त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे आणि ती अनुभूती मनात कायम ठेऊन त्यांचे स्मरण सतत ठेवावे असाच हा कार्यक्रम आहे.. चंद्र.. चांदण्या..फुले वेचून..त्यामागची कळ्यांची वेदना तुम्हाला जगायला अधिक शिकवेल हे नक्की..
- सुभाष इनामदार, पुणे subhashinamdar@gmail.com

Friday, April 28, 2023

पर्यटकांचे सुख जपणारे अजित करंदीकर

रत्नागिरीचे अमृता ट्रॅव्हल्सची निवड करणारे आम्ही पुणेरी ..पण ती निवड किती उत्तम होती याची पारख आम्ही काश्मीर आणि आसाम, मेघालय अरुणाचल येथे जाऊन आल्यावर कळाले की ती किती उत्तम होती...याचे एकमेव कारण म्हणजे या कंपनीचे संचालक अजित करंदीकर.. पैश्यापेक्षा आपलेपणाने प्रत्येकाशी नाते जोडताना त्यांच्या सुखात समाधान मानणारे हे व्यक्तिमत्व. सहा फुटाची उंची असलेला..सैन्यदलात पंधरा वर्षे काम केल्याने तगडेपणा..भारदस्त देह..आनंदी आणि रुबाबदार चेहरा..सगळ्यांना समजून घेऊन शेवटी ठिक आहे..असे आवर्जून सांगणारा माणूस..सहजपणे इतरांवर प्रभाव पडेल असे व्यक्तिमत्व..अजित करंदीकर.. अमृता ट्रॅव्हल्स यांचे नाव आमच्या मैफल ग्रुपच्या एकांनी सुचविले आणि आम्ही त्यांच्या संपर्कात आलो..गेली २२ वर्षे त्यांनी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अमृता यांनी रत्नागिरीत त्या भागातील पर्यटकांसाठी आपलेपण जपणारी कंपनी काढून कोकणातून बाहेर पडण्यासाठीची नजर त्यांनी प्राप्त करून दिली..आणि आलेल्या लोकांच्या मनात आपले स्थान पक्के केले ते त्यांच्या उत्तम नियोजनबध्द आणि नेटक्या शिस्तशीर सहलीच्या माध्यमाने.. काश्मीर हा तसा वेगळा सुरक्षा असणारा अनोखा भाग आणि तर थ्री सिस्टर हा चायना सीमेवरच्या अतिथंडीतला १५ हजार उंचीवरचा भूप्रदेश..पण दोन्ही ठिकाणी अजित करंदीकर यांनी आम्हा साऱ्या पर्यटकांना जे जे नमूद केले त्या त्या ठिकाणी नेण्याची कसरत पूर्ण समाधानाने पार पाडली..आमच्या प्रत्येकाच्या आरोग्यास प्राधान्य देऊन..काय हवे नको ते साध्य करून दिले.. प्रसंगी आपल्या स्वभावातील माणुसकीचे दर्शन घडविले..ठरलेल्या रकमेच्या व्यतिरिक्त एकाही पैशाची अधिक मागणी न करता जे जे तुमच्या मनात असेल ते सांगा मी ते पुरवितो.. तुम्ही फक्त सांगा तुम्हाला काय हवे..मी तिथे मिळाले तर नक्कीच देईन..असे सांगत प्रवाशांना आपलेसे करत आपुलकीचे नाते जपले.. व्यवसाय पेक्षा नाती आणि माणुसकी सांभाळणारी ही अमृता ट्रॅव्हल्सची पताका का इतक्या सहजपणे पर्यटकांच्या पसंतीस उतरली याचे दर्शन आम्हाला अजित करंदीकर यांच्या सहवासात घडले.. यापूर्वी अनुभव ट्रॅव्हल्स यांच्या कडून केलेल्या अरुण भट यांच्या सहलीत आला होता..त्यानंतर आम्ही नवीन सहल कंपनी शोधत होतो. जिथे उत्तम लक्ष दिले जाईल आणि आपल्याला समाधानाने फिरता येईल..ते उदाहरण आता नक्की झाले...अमृता ट्रॅव्हल्स..रत्नागिरी.. काश्मिरच्या सहलीत सिंधुदुर्ग, कुडाळ, चिपळूण, रत्नागिरी,मालगुंड येथील कोकणवासीय ओळखीचे झाले..थ्री सिस्टर सहलीत..पुणे, सोलापूर, कोल्हापूर सारख्या शहरातील पर्यटक सहभागी झाले होते. थोडक्यात तुम्ही कुठलेही असलात तरी अजित आणि सौ. अमृता करंदीकर यांच्या बरोबर सामील होऊन तुमच्या फिरण्याचा आनंद सुरक्षित आणि समधानेने घेऊ शकता असे हे विश्वासपूर्ण नाव आहे.. उदाहरण द्यायचे तर शिलाँगयेथून बांगलादेश सीमेवरील उमेद नदीवर जायचे होते..पण शिलाँग सोडले आणि रस्त्यावर मध्येच कळाले की मध्ये रस्त्यावर दरड कोसळून रस्ता बंद आहे..मग सर्वांना बोलावून अजित सरांनी विचारले आपण पर्यायी रस्ता शोधून जाऊ. पण सुमारे १५० कि.मी. प्रवास वाढेल..आणि रात्री मुक्कामास उशीर होईल..असे सांगून त्यांनी दुसऱ्या मार्गाने निघालो देखील..पण यामुळे खर्च वाढेल..ह्याची जाणीव होती...आम्ही शेवटच्या दिवशी त्या खर्चात आमची मदत देण्यास सारे तयार होते..पण करंदीकर यांनी ठामपणे सांगितले..तुमचे समाधान हे महत्वाचे आहे..माझा खर्च झाला..खरा..तरीही मी फायद्यात आहे.. तुम्ही कुणीही काहीही द्यायची गरज नाही.. आणि त्यांनी तो विषय संपविला.. कुणाही सहभागी मंडळींनी खिशातून एकही पैसा काढायचा नाही..आणि तसा खर्च केला तर मला सांगा आणि ते माझ्याकडुन मागून घ्या.. केवळ हा भाग नाही.. तर काश्मीर येथे शक्य नव्हते पण थ्री सिस्टर येथे बरोबर स्वयंपाकी होते.. प्रत्येक ठिकाणी रोज वेगळा मेनू.. चवदार..आणि उत्तम. रोज वेगळे गोड.. ताक शिवाय रोज सकाळी आणि संध्याकाळी चहा..भरपूर..आणि अगत्याचे दर्शन.. इतरांबरोबर स्वतःही या आनंदात सहभागी होऊन मीही तुमच्यतील एक बनून वावरणे हे अजित सरांचे वैशिष्ठ्य होते. मालक असल्याचा आविर्भाव न बाळगता..सर्वांना आपलेसे करून उत्तम ते ते दाखविण्यास सतत उस्तुक असलेले अजित सर मनात कायम कोरले गेले..त्यांच्या बरोबर आम्ही सुमारे २० दिवस घालविले . त्या आठवणी आम्ही नेहमीच जवळ ठेऊ आणि त्यांच्याबरोबर सहली करण्यास इतरांना सांगू अजित करंदीकर.. तुम्ही आम्हाला आनंद आणि समाधान दिलेत..असेच प्रेम कायम राहो हीच मनोमनी प्रार्थना.. अमृता ट्रॅव्हल्स जेंव्हा २५ वर्षाची होईल तेंचा जरूर रत्नागिरीत येऊ.. तुमचाच, सुभाष विश्वनाथ इनामदार, पुणे ९५५२५९६२७६

Monday, January 9, 2023

मला भेटलेले विश्वास मेहेंदळे...!

नक्की साल नाही आठवत..पण सांस्कृतिक खात्याच्या मुंबईतल्या कार्यालयात साठे म्हणून एक उमदे व्यक्तिमत्व होते.. आमचे नाटक राज्य स्पर्धेत बक्षिसपात्र असल्याने नाट्य शिक्षण अभ्यासक्रमात सहभाग मिळावा म्हणून तिथे गेलो असताना.. त्यांनी मला तेंव्हा नवे संचालक म्हणून आलेले विश्वास मेहेंदळे यांची ओळख करून दिली.. बोलके आणि मनमोकळे असलेले मेहेंदळे मग एकदम आपलेसेच वाटायला लागले.. गप्पा आणि प्रचंड ओळखी असलेले हे बहुआयामी व्यकित्मत्व मनात रुजून बसले.. साधेपणा.. कुठलाही खोटा डौल नाही.. आणि तिथल्या तिथे निर्णय घेऊन तो अमलात आणण्याची हातोटी यामुळे ते कलाक्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या लोकात सहज जाऊन बसले.. त्यांना खोटेपणाचा तेंव्हापासून तिटकारा बोलण्यातून जाणवत होता. मीही नाटककार विद्याधर गोखले यांच्या संपर्कात होतो.. त्यांनाही त्यांच्यांबद्दल आदर होता. मी तरुण भारत या दैनिकातून राजीनामा देऊन बसलो होतो..पण कुठे काम नव्हते.. मला त्यांनी १९८१ ते १९८३ संस्कृतिक खात्यातर्फे होणाऱ्या नाट्य महोत्सवात प्रतिनिधी म्हणून नियुक्ती पत्र दिले.. त्यामुळे माझेवर त्याकाळीचे उपकारच त्यांनी केले होते. अशी व्यक्ती सरकारी कामात फार दिवस टिकणार नाही ..कारण त्यांचा स्पष्टवक्तेपणा .. तसेच झाले.. दामू केंकरे यांच्यानंतर ती संचालक पदाची खुर्ची विश्वासराव यांनी घेतली.. पण ते फार काळ राहिले नाहीत.. अशी चांगली माणसे सरकारी चाकोरीत टिकणे कठीण असते..तेच झाले सरकारी नोकरीतून मेहेंदळे बाहेर पुन्हा माध्यमांच्या दुनियेत गुरफटले.. पुढे ते पुण्यात स्थायिक झाले.. सिंबायोसिस मध्ये वृत्तपत्र विद्या शिकविण्याचे नवे दालन त्यांनी उघडले.. पुढे.. काही काळ लालन सारंग यांच्यासोबत काही नाटकात कामे केली.. पण तिथे रमले नाहीत.. त्यांनी लेखनाचा ध्यास घेतला.. लोकमान्य टिळकांच्या अग्रलेखाचा अभ्यास करून पुणे विद्यापीठ मध्ये डॉक्टरेट मिळविली. नवी दिल्ली पासून दूरदर्शनवर बातम्या देण्याचे काम केल्याने त्यांना विविध मोठे लोक, राजकारणी यांना जवळून बघता आले..त्यातूनच त्यांना संवाद साधण्याची उत्तम कला अवगत होती.. मग त्यांनी मला भेटलेली माणसे.. सारखी व्याख्याने दिली..त्यातूनच त्यांच्या बोलण्याची ताकद उमगली.. त्याचेच पुस्तक केले.. पत्रकारिता.. समाज माध्यम आणि नाटक यातून त्यांचा पिंड उत्तम तयार झाला.. माणसे जोडली तशी तोंडावर गोड बोलण्याचा स्वभाव नसल्याने.. त्यांना वाईट अनुभवांना सामोरे जावे लागले.. यातूनच ते फारसे दिसेनासे झाले.. अलिप्त होत गेले.. थोडे एकाकी बनले.. पण सतत मला हवे तसेच मी बोलणार..हा स्वभाव कायम ठेवला.. काहींनी जवळ केले..काहींनी झिडकारले.. पण ते ठाम राहिले.. सरकारी नोकरीत असल्याने.. आर्थिक बाबतीत ते कुणावर अवलंबून नव्हते.. ते स्वतंत्र होते.. अखेरपर्यंत स्वतंत्र राहिले.. वडील कीर्तनकार होते..त्यामुळे आख्यान रंगविण्याची त्यांची हातोटी व्याख्यानातून बाहेर डोकावत होती.. उत्तम वक्ते.. उत्तम निरीक्षणशक्ती आणि परखड विचार यातून विश्वास मेहेंदळे हे व्यक्तिमत्व मनात आणि समाजात कायम लक्षात राहील असेच होते.. एक इतिहास त्यांनी तयार केला.. घडविला.. त्यांच्या जाण्याने उत्तम व्यक्ती समाजमनातून हरपल्याची जाणीव होत आहे.. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...! - सुभाष इनामदार, पुणे subhashinamdar@gmail.com

Thursday, January 5, 2023

व्हायोलिनचा समृध्द वारसा गुरुवारी रसिकांनी अनुभवला!

ज्येष्ठ व्हायोलिन वादक पंडित भालचंद्र देव यांच्या प्रथम स्मृतदिनानिमित्त त्यांच्या कन्या आणि शिष्या सौ. चारुशीला गोसावी यांनी गुरुवारची संध्याकाळ आपल्या उत्तम वादनाने रसिकांच्या मनात उमटविली. व्हायोलिन गाते तेंव्हा.. या कार्यक्रमातून. स्वरबहार आणि सांस्कृतिक पुणे आयोजित कार्यक्रमाची सुरवात भालचंद्र देव यांच्या छोट्या ध्वनिचित्रफीतीने झाली. आरंभी चारुकेशी रागातली बंदिश सादर करून..त्यांनी व्हायोलीनवरची आपली हुकूमत सिद्ध करून..रसिकांना आपलेसे केले. देवाचीये द्वारी पासून अभंग जिवलागा कधी रे येशील तू , वादळ वारं सुटलं ग, का हो धरिला सारखी वेगळ्या बाजाची गीते.बाई माझी करंगळी मोडली.. सारखी खणखणीत लावणी. त्यात वाजलेली ढोलकी... आणि मग बाजे मुरलीया, ओ सजना, मधुबन सारखी हिंदी गीते अशी काही रंगतदार सादर झाली की रसिकांना वन्समोअरचा आवाज द्यावा लागला. नीगाहे मिलानेको जी चाहता है आणि लागा चूनरी मे दाग..या गाण्याच्या भैरवीला आवश्यक असा स्वर ,ताल आणि टाळ्यांचा कडकडाट करून व्हायोलीनची आनंदमयी सफर चारुशीला गोसावी यांनी घडवून आणली.. व्हायोलीनच्या सुरावटितून शब्द आणि त्यातला अर्थ रसिकांच्या मनात अलगदपणे आकार घेईल असे तयारीचे वादन इथे चारुशीला गोसावी यांच्याकडून होत होते.. गाण्यातील हरकती आणि सुरावटी सफाईदार आणि सहजपणे वाद्यातून उमटत होत्या. त्याही आपल्या वडीलांप्रमानेच व्हायोलिन वाद्यातील शिष्य घडविण्याचे कार्य करीत आहेत.. एक आदर्श कलावंत आणि व्हायोलिन गुरू म्हणून त्यांच्याकडे पहाता येईल. मोहन पारसनीस (तबला), विनीत तिकोनकर (तबला आणि ढोलकी) , अमृता दिवेकर ( सिंथसायझर) राजेंद्र साळुंके( तालवाद्य), प्रसन्न बाम( हार्मोनियम).. यांच्या उत्तम साथीच्या संगतीत व्हायोलिन गीतांचा नजराणा रसिकांनी आनंदाने झेलला.. यावर कडी म्हणजे.. नीरजा आपटे यांचे सूचक आणि गाण्यांच्या निवडीला साजेसे अनोखे निवेदन.. भैरवी धून वाजवून गोसावी यांनी ही मैफल संपविली. कलेचा उत्तम वारसा जपत त्यांनी तो रसिकांच्या मनात व्हायोलीनची गोडी निर्माण केली आहे. असेच कार्यक्रम व्हायोलिन या वाद्यांचे सादर करून वडिलांची समृध्द कला परंपरा कायम पुढे नेतील असा विश्वास यामुळे रसिकांना पुन्हा एकदा आला. - सुभाष इनामदार, पुणे subhashinamdar@gmail.com

Monday, December 19, 2022

सवाई गंधर्व ६८ वा.असा झाला

सवाईच्या पहिल्या दिवसाची निरीक्षणे..!
करोनाच्या कालावधीनंतर पुण्यातील संगीत रसिकांसाठी ६८ वा सवाई भीमसेन महोत्सव बुधवारी मुकुंदनगर भागातील महाराष्ट्रीय मंडळाच्या शामियानात पुन्हा सुरू झाला.. यंदा प्रथमच संपूर्ण महोत्सवासाठी एकच तिकिटाचा पर्याय आर्य संगीत मंडळाने ठेवला आहे.. त्यामुळे म्हणा किंवा बदललेल्या काळाची दखल म्हणा पहिल्या दिवशी बऱ्याच खुर्च्या आणि भारतीय मंच रीता दिसत होता.. रसिक होते पण भरपूर आस्वादक गैरहजर होते.. मंडपात लांबवर मंचावर बसलेल्या आणि खुर्च्यातून आस्वाद घेणाऱ्या रसिकांना मंचावरील गाणे ऐकायला येत होते..पण कलाकार जवळून पहाता येत नव्हते.. चार स्क्रीन होते पण ते लांब होते.. बाहेर अनेक विक्री मंडप रीते दिसत होते.. नाही म्हणता खाद्य पदार्थांना अधिक मागणी होती.. उपेंद्र भट, शाश्वती मंडल, रतन मोहन शर्मा आणि उस्ताद अमजद अली खाँ.. हे चार कलावंत पहिल्या दिवसाचे आपले सादरीकरण उत्तमोत्तम करीत होते. पण रात्री दहाला कार्यक्रम संपविण्यासाठी सादरीकरणात मर्यादा दिसत होती.. अमजद अली खाँ यांनी पुण्यातील पोलीस आयुक्तांना हे वेळेचे बंधन शिथिल करण्याचे जाहीर आवाहनही केले.. त्यामुळे कलावंत मनसोक्त कला सादर करू शकत नाही याची खंत व्यक्त केली. असो.. पहिला दिवस.. वत्सलाबाई भीमसेन जोशी यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य उपेंद्र भट यांना प्रदान करण्यात आला.. त्यांच्या गायनातील रंगत रसिकांनी अनुभवली.. ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका शाश्वती मंडल यांचे तयारीचे रसिकांनी अनुभवले. रतन मोहन यांची भक्तीमय शैली आणि स्वरातला भाव आवडला..त्याला दाद मिळाली.. सादरीकरणात उस्ताद असलेले सरोवादक अमजद अली खाँ..यांची संवाद साधत रसिकांना आपलेसे केलेले वाद्यवादन..ही खरी मौज संगीत रसिकांनी दिलखुलापणे अनुभवली.. निवेदक आनंद देशमुख यांची नेमकी टिपणे आणि आवश्यक तेव्हढेच बोलणे आणि सतीश पाकणीकर यांची भीमसेन शक्ती याची खास नोंद घ्यावी वाटते. सवाई महोत्सवातील संगीत वातावरण असेच भारलेले असते..ते शब्दात सामावू शकत नाही..ती अनुभूती. प्रत्यक्ष घ्यावी अशीच असते.. यंदा पाच दिवस हा स्वरयज्ञ सुरू रहाणार आहे.. पाहू या गुरुवारी कशी निरीक्षणे नोंदता येतील ते.. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव ..दुसरा दिवस.. अविनाश कुमार या तरुण गायकाने आरंभ केला.. पण उपस्थित रसिक इथे अभावानेच इथे दिसत होते.. त्यांच्या गाण्याचा परिणाम फारसा दिसला नाही.. पहिले दोन तास अगदी आलम खाँ यांच्या सरोद वादना पर्यंत रसिक तुरळक दिसले.. मैहर सेनी घराण्याचे सुप्रसिद्ध सरोदवादक आलम खाँ यांचे सरोदवादन झाले. त्यांना सत्यजित तळवलकर यांनी तबल्यासाठी साथ केली. माहौल बहरला तो पंडित साजन मिश्रा आणि करोना काळात गमावलेले ज्येष्ठ गायक राजन मिश्रा यांचे सुपुत्र स्वरांश मिश्रा यांचे स्वरमंचावर आगमन झाले आणि रसिकात वाढ झाली.. विस्कळीत झालेले रसिक मुख्य मंडपात गायनाचा आस्वाद घेण्यासाठी एकत्र आले आणि दादही तशी मिळाली.. शताब्दी स्मरण या सतीश पाकणीकर यांच्या भातरत्न भीमसेन जोशी यांच्या विविध मुद्रा आणि मागील सवाई गंधर्व महोत्सवात त्यांचेसोबत विविध जागतिक कीर्तीच्या गायकांबरोबर काढलेल्या स्मृती असलेल्या सुमारे ७५ छायाचित्रांचे प्रदर्शन पाहण्यासाठी अनेक रसिक इथल्या खास दालनात येत होते.. चित्र काढू नका हे लिहूनही अनेकजण ते चित्र आपल्या मोबाईलमध्ये टिपताना दिसत होते. आनंद देशमुख भीमसेन जोशी यांच्यावरील काही निवडक ठळक गोष्टी लोकांसमोर आणत होते.. साजन मिश्रा यांना साथ करणारे हार्मोनियम वादक उशिरा आल्याने भीमसेन जोशी यांच्या आठवणी रसिकांच्या मनात रुजविण्यासाठी या वेळेचा सदुपयोग केला गेला.. आज पुण्याचे पालकमंत्री येणार असल्याने इथे सुरक्षा अधिक सतर्क झाल्याचे दिसले. इथल्या भव्य मंडपात रसिकांना कलावंताचा आवाज सर्व दूर नीट ऐकू यावा यासाठी स्वरांजलीचे प्रदीप माळी यांचा सतत प्रयत्न दिसत होता. या महोत्सवात 'राजहंस प्रकाशन'तर्फे ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. सत्यशील देशपांडे लिखित 'गान गुणगान - एक सांगीतिक यात्रा' या पुस्तकाचे प्रकाशन श्रीनिवास जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रकाशक दिलीप माजगावकर उपस्थित होते. छायाचित्रकार लोकप्रिय कलावंतांची छबी मिळविण्यासाठी रसिकांमध्ये मिसळून प्रयत्न करताना दिसत होते.. विशेषतः विदुषी डॉ. एम राजन, संगीता शंकर ,रागिणी व नंदिनी यांचे एकत्रित चित्र मिळावे यासाठी चाललेली धावपळ दिसत होती.. दुसरा दिवस रसिकांच्या मनात रुजविला तो साजन आणि स्वरांश मिश्रा यांनी..तर यावर कळस केला तो डॉ. एम राजन आणि त्यांच्या कन्या आणि नातींच्या उत्तम वादनाने.. चार व्हायोलिनची एकत्रित सुरावट मनात साठवीत आज भारलेल्या तृप्ततेने घरोघरी गेला.. आणि रसिकांची आठवण काढत एम राजमही भारावल्याचे जाणवले.. सवाईचा तिसरा दिवस..लक्षणीय! ६८ वास सवाई गंधर्व संगीत महोत्सव रंगतदार होत जाणार हे आता नक्की झाले.. पुण्यात, महाराष्ट्रात,देशात आणि परदेशातही कीर्ती पोचलेला हा स्वरमंच अनेकविध घटनांनी आणि कलाकारांच्या हजेरीतून लक्षात रहात आहे.. बाहेर उन्हाचे सावट असताना उपस्थित रसिकांना आपल्या उत्तम ,कोमल आणि तयारीच्या सुरावटितून गुंतवून ठेवण्यात मनाली बोस या कलाकार यशस्वी झाल्याचे दिसले.कोलकातास्थित किराणा घराण्याच्या गायिका मनाली बोस यांनी राग मारवामध्ये एकतालात हळूवार सादरीकरणाने आपल्या गायनाची सुरवात केली. त्यानंतर 'अब काहे सतावो जावो...' हा गारा व पिलू रागातील मिश्र दादरा व भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे लोकप्रिय भजन 'बाजे रे मुरलिया बाजे' सादर केले. त्यांना अभिनय रवांदे (हार्मोनियम) पांडुरंग पवार (तबला) यांची संगत लाभली. संध्याकाळचा हंसध्वनी रागाने मेजवानी दिली ती तरुण आणि उत्तम संतूर वादक राहुल शर्मा यांनी.. पुणेकरांचे कौतुक करून त्यांनी आपल्या वादनातले सौंदर्य रसिकांच्या हृदयात उतरविले.. आलाप, जोड, झाला आणि दृत तीनताल त्यांनी सादर केला. मिश्र खमाज धूनमध्ये दादरा आणि तीनताल सादरीकरणाने त्यांनी आपल्या वादनाचा समारोप केला. त्यांना ओजस अढीया (तबला) यांनी अतिशय समर्पक साथ केली. मध्यंतरात रसिकांचे पाय आजूबाजूचे वातावरण टिपत टिपत.. चहा.. कॉफी आणि खाद्यपदार्थ दालनाकडे वळताना दिसत होते.. बाहेर उभे केलेले भीमसेन जोशी यांच्या भव्य फलकाकडे आकर्षित होऊन त्यासोबत आपली छायाचित्र काढण्यात काही धन्यता मानत होते.. इकडे मंडपात भीमसेन जोशी यांचे सुपुत्र आणि या महोत्सवाचे प्रमुख श्रीनिवास जोशी यांचे स्वरमंचावर आगमन झाले.. त्यांनी बिहाग रागाने आपल्या गायनाची सुरूवात केली. संत कबीर यांची रचना असलेला आणि जोशी यांनी संगीत दिग्दर्शन केलेल्या 'गुरुविण कौन बतावे बाट' या भजनाने त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. अविनाश दिघे (हार्मोनियम), पं.रवींद्र यावगल (तबला),गंभीर महाजन (पखावज) आणि माऊली टाकळकर (टाळ) यांनी त्यांना साथ केली. मंचावरून झाली उतरलेल्या अवघ्या ९६ वर्षांच्या माऊली टाकळकर यांच्यावर प्रेमाचा वर्षाव त्यांचा सत्कार करून केला गेला. रसिकही त्यामुळे भारावून गेले होते.. आपल्या निवेदनाची तिशी पूर्ण करणारे आनंद देशमुख यांच्या आवाजाची जशी रसिकांना सवय झाली आहे तशी गायकांच्या पिढ्याही त्यांच्या निवेदनाने कशा इथल्या स्वरमंचावर अवतरल्या याची एक यादीच देशमुख यांनी इथे सादर करून.. ही महान शास्त्रीय संगीत परंपरा इथे जपली जात आहे याचे उदाहरण त्यांनी प्रस्तुत केले. उपस्थित रसिकांमध्ये आज पुण्याच्या विकासात ज्यांचा वाटा आहे असे माजी खासदार सुरेश कलमाडी सौ. मीरा कलमाडी यांच्यासह ठळकपणे दिसले.. तर काही काळासाठी शिवसेनेच्या नेता आणि उपसभापती निलमताई गोरे हजर होत्या. आजच्या दिवसाची सांगता अभ्यासू आणि कलावंत घडविणारे श्रेष्ठ गुरू पं. अजय चक्रवर्ती यांच्या भारदस्त गाण्याने झाली.. उपस्थित तरुण कलावंत यांना मार्गदर्शन करून ह्या महोत्सवात येण्याचा बहुमान मिळायला भाग्य लाभते ते लाभल्याने..ह्या भिमतिर्थाला त्यांनी वंदन केले. सादरीकरण करताना वेळेचे गणित आखून त्यांनी बरोबर दहा वाजता आपली सेवा थांबविली.. त्यांनी राग बागेश्रीने गायनाला सुरुवात केली. सुरेल गायकी अन् त्याला साजेसे वादन यामुळे चक्रवर्ती यांची मैफिल उत्तरोत्तर रंगली. त्यानंतर चक्रबर्ती यांनी पहाडी राग सादर केला. अजय जोगळेकर (हार्मोनियम), ईशान घोष ( तबला), मेहेर परळीकर आणि सौरभ काडगावकर यांनी त्यांना साथसंगत केली. वेळेची मर्यादा आता घालू नये अशी विनंती करायला ते विसरले नाहीत.. धीरगंभीर स्वराचे वलय निर्माण करत त्यांनी आपले गायन संपविले. सवाईचा चौथा दिवस.. रसिक भारावलेले...! दुपारी तीन ते रात्री बारा अशी मोठी पर्वणीच सवाईच्या रसिकांना शनिवारी लाभली.. सुरवातीपासूनच इथे रंग भरत गेला.. यशस्वी सरपोतदार यांचे आक्रमक आणि तेजस्वी स्वरांनी लपेटलेले गायनाने श्रोता खुश झाला.. उत्तम स्वरलगाव आणि मनाला आनंद देणारे गायन सादर करून त्यांनी स्वरमंचाला मोहित करून टाकले. हरकती आणि लयकारी यांचा सुंदर मेळ त्यांच्या सादरीकरणात पाहायला मिळाला. या महोत्सवात पहिल्यांदाच या व्यासपीठावर कला सादर संधीचा उत्तम फायदा त्यांनी करून घेतला.‘रंग डारूंगी नंद के लालन पे...’ या होरीने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप करून रसिकांची मने जिंकली. त्यांना मिलिंद कुलकर्णी (संवादिनी), पं. रामदास पळसुले (तबला) यांची उत्तम साथ मिळाली. भोपाळच्या मातीत आपली ध्रुपद गायकी विकसित करणारे पं. उमाकांत गुंदेचा आणि अनंत गुंडेचा ह्या काका पुतण्याच्या जोडीने सवाईत आलेल्या प्रत्येक श्रोत्यांच्या मनात आपला ठसा कायम केला.. ओम तोम ची या गायनातील परंपरा त्यांनी आपल्या शैलीतून उत्तम सादर केली. धीरगंभीर आणि आक्रमक हे एकाच गायनातले कौशल्य त्यांनी सहज साध्य केले आहे.. उमाकांत गुंदेचा सांगतात..धृपद हा गायनाचा प्राचीन प्रकार असून, सामवेदातून त्याची निर्मिती झाली असल्याचे मानले जाते. २००४ साली भोपाळ येथील आमच्या धृपद संस्थान या गुरुकुलचे उद्घाटन पंडित भीमसेन जोशी यांनी केले होते. गुंदेचा यांनी राग चारुकेशीने आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. त्यांनी पारंपरिक आलाप, विलंबित, मध्यलय अर्थात आलाप जोड झाला यांचे दमदार सादरीकरण केले. यानंतर त्यांनी चौदा मात्रेतील धृपद धमार प्रस्तुत केला. राग अडाणामधील ‘शिव शिव शिव शंकराधिदेव...’ या शिवस्तुतीने अधिक समाधान दिले. त्यांना बंधू पं. अखिलेश गुंदेचा व ज्ञानेश्वर देशमुख यांनी पखवाजवर कमाल केली. आज आठ कलावंतांनी महोत्सवाची रंगत अधिकाधिक वाढविली.. आजूबाजूचा परिसर आणि मंडपातील रसिकांची गर्दी त्याची साक्ष देत होती.. आग्रा घराण्याच्या गायिका भारती प्रताप यांनी राग श्री ने आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. त्यांनी ‘सांज भई...’ ही विलंबित एकतालातील रचना प्रस्तुत केली. भीमसेन जोशी यांनी गायलेल्या पुरंदरदास यांच्या कानडी अभंगाने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. त्यांना अभिनय रवांदे (संवादिनी), रविंद्र यावगल (तबला) यांची साथ लाभली. विराज यांच्या गायनाने विराट दर्शन! भीमसेन जोशी यांचा नातू विराज जोशी यांनी सवाई मध्ये जमलेल्या तरुण कलाकारांना प्रेरणा देणारे तयारीचे गायन सादर करून आपलेसे केले.. रसिकांना त्यांनी आजोबांच्या गायनाची झलक दाखविली. किराणा घराण्याचे उदयोन्मुख गायक असलेल्या विराज जोशी यांनी राग मारुबिहागने आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. पं. भीमसेन जोशी यांच्या ‘संतवाणी’ या कार्यक्रमाला यावर्षी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचेच औचित्य साधत त्यांनी अजरामर केलेल्या भक्तीसंगीताची झलक विराज यांच्या गायनाने रसिकांनी अनुभविली. अविनाश दिघे (संवादिनी), पांडुरंग पवार (तबला), सुखद मुंडे (पखावज) व माऊली टाकळकर (टाळ), अपूर्व द्रविड (तालवाद्य) तर राहुल गोळे (ऑर्गन) यांनी साथसंगत केली. पुन्हा एकदा माऊली टाकळकर यांच्याविषयीच्या प्रेमाला उधाण आल्याचे पहायला मिळाले. गायक सिड श्रीराम यांनी कर्नाटक शैलीतील संगीताची सुरेल अनुभूती उपस्थितांना दिली. श्रीवल्ली या अलीकडेच गाजलेल्या गीताने सीड श्रीराम तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्यांच्या कर्नाटक संगीताच्या प्रस्तुतीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. भाषा न कळूनही सवाईतील रसिकांनी त्यांचे गायन अनुभवण्याचा प्रयत्न केला. त्यांना राजीव मुकुंदम (व्हायोलिन), जे. वैद्यनाथन (मृदंगम्), डॉ. एस. कार्तिक (घटम्) यांची उत्तम साथ मिळाली. आज मंडपात आणि बाहेरही रसिक या संगीत वातावरणाचा आस्वाद मनसोक्तपणे घेत असल्याचे चित्र होते.. मुकुंद संगोराम लिखित ‘सूरश्रेष्ठ’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी व सुरेश एजन्सीचे शैलेंद्र कारले यांच्या उपस्थितीत प्रकाशन झाले. पं. फिरोज दस्तूर यांचे शिष्य व किराणा घराण्याचे गायक असलेल्या गिरीश संझगिरी यांनी पंडित फिरोज दस्तूर यांच्या जीवनावर लिहिलेला चरित्रग्रंथ ‘घट घट में संगीत समाये’ याचे व ‘चंद्रमुखी’ या संझगिरी यांच्या स्वरचित बंदिशीचे पुस्तक यांचे प्रकाशनदेखील यावेळी करण्यात आले. सुप्रसिद्ध गायक उस्ताद राशीद खान व सतारवादक उस्ताद शाहीद परवेज या दोन सुप्रसिद्ध कलाकारांच्या जुगलबंदीने महोत्सवाच्या चौथ्या दिवशी रंगतदार बनत गेला. ‘याद पियां की आयें...’ ह्या जुगलबंदीत सादर झालेल्या ठुमरीने रसिक अधिक तृप्त झाले. त्याआधी उस्ताद राशिद खान यांनी मालकंस रागाने आपल्या गायनाला सुरूवात केली. मालकंस रागात त्यांनी 'जिनके मन राम बिराजे.. ' ही विलंबित बंदिश आणि 'याद न आवत मोरी प्रीत..' व 'आज मोरे घर आये न बलमा..' या द्रुत बंदिशी सादर केल्या. त्यांना ओजस अढीया (तबला), साबीर खान (सारंगी), नागेश अडगावकर, निखील जोशी व राशीद खान यांचे सुपुत्र अरमान खान (गायन व तानपुरा) यांनी साथसंगत केली. शाहीद परवेज यांनी राग झिंझोटीमध्ये आलाप, जोड, झालाचे सादरीकरण केले. त्यांना ओजस अढीया यांनी समर्पक तबला साथ केली. शनिवार हा सर्वार्थाने सवाई मधील अधिक स्वरांनी भारावलेला दिवस ठरला. संगीत रसिकांच्या सवाईची सांगता..पाचवा दिवस स्वर, नाद आणि तालमय..! आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा रविवारी शेवटचा दिवस होता. सकाळपासूनच मंडप पुरता रसिकांनी भरून गेला होता.. सकाळी दहा पासूनच आपापल्या जागा आरक्षित करणारे रसिक इथे हजर होते.. ही गर्दी पुढे पुढे वाढत गेली.. आणि कलाकार आणि आयोजकांना यामुळेच बळ मिळाले. राग वृंदावनी सारंगने पं. आनंद भाटे यांनी आपल्या गायनाची सुरूवात केली. पंडित भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेली 'मन राम रंगी रंगले' ही भक्तीरचना त्यांनी खास शैलीत सादर केली. पंडितजी आणि लता मंगेशकर या दोन भारतरत्नांनी गायलेल्या अतिशय लोकप्रिय अशा 'बाजे मुरलिया बाजे' या गीताच्या तडफदार सादरीकरणातून त्यांनी या दोन्ही दिग्गजांना आपली आदरांजली अर्पण केली. त्यांच्या या प्रस्तुतीला रसिकांनी उभे राहून टाळ्यांची उस्फूर्त दाद दिली. त्यांना सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), भरत कामत (तबला), प्रसाद जोशी (पखवाज), माऊली टाकळकर (टाळ) यांनी साथ केली. बनारस घराण्याचे ज्येष्ठ बासरीवादक राजेंद्र प्रसन्ना यांचे बासरीवादन रसिकांना आवडले. त्यांनी राग अलया बिलावलद्वारे आपल्या वादनाची सुरुवात केली. त्यानंतर पहाडी धून सादर करत, बनारसी दादराच्या प्रस्तुतीने त्यांनी आपल्या वादनाचा समारोप केला. त्यांना रवींद्र यावगल (तबला), राजेश व ऋषभ प्रसन्ना (बासरी साथ) यांनी त्यांना संगत केली. पं. भीमसेन जोशी यांचे दीर्घकाळ मार्गदर्शन लाभलेले राजेंद्र कंदलगावकर यांनी भीमपलास रागाने आपल्या गायनाची सुरूवात केली. पंडित भीमसेन जोशी यांच्या 'भाग्यदा लक्ष्मी बारम्मा..' या लोकप्रिय भजन सादर करून रसिकांची दाद मिळविली. त्यांना उमेश पुरोहित (हार्मोनियम), पं. रामदास पळसुले (तबला), माऊली टाकळकर (टाळ) यांनी साथ केली. महेश काळे व अमेरिकेतील संदीप नारायण यांची हिंदुस्थानी- कर्नाटक संगीताची जुगलबंदी रसिकांनीअधिक पसंत केली. जन्मशताब्दी वर्षानिमित्त सवाईमध्ये गाण्याची संधी मिळत आहे, याचा अतिशय आनंद होत आहे. असे महेश काळे म्हणाले.. संदीप आणि मी लहानपणापासूनचे मित्र आहोत मात्र आज तब्बल १५ वर्षांनंतर एकत्र गात आहोत, असे सांगत त्यांनी धानी रागाने आपल्या गायनाची सुरूवात केली. यामध्ये 'देवी ब्रोवा समयमी दे...' ही कर्नाटक संगीतातील बंदिश, 'लंगरवा छंड मोरी बैया...' ही हिंदुस्थानी संगीतातील बंदिश जलद लयीत, 'मोरे सर से सरक गई गगरी...' ही मिश्र बंदिश आणि तराणा सादर केला. त्यांनतर 'कृष्णानी बेगडी बारू' हे कर्नाटकी संगीतातील उपशास्त्रीय गीत सादर केले. त्यांनी सादर केलेल्या 'कानडा राजा पंढरीचा' या अभंगास रसिकांनी टाळ्यांचा गजर करत दाद दिली. यावेळी महेश काळे यांना राजीव तांबे (हार्मोनियम), विभव खांडोलकर (तबला), ओंकार दळवी (पखवाज), अपूर्व द्रविड (साइड रिदम), प्रल्हाद जाधव, अमृत छ्नेवार, मनाली जोशी (तानपुरा आणि गायन) यांनी साथसंगत केली. तर संदीप नारायण यांना व्हीव्हीएस मुरारी (व्हायोलिन), साई गिरीधर (मृदंग), चंद्रशेकर शर्मा (घटम) यांनी साथसंगत केली. अर्चना जोगळेकर यांच्या नृत्याला पसंती..! प्रसिद्ध कथक नृत्यांगना व अभिनेत्री अर्चना जोगळेकर यांनी सादर केलेल्या 'श्रीराम स्तुती'ने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कथक सादरीकरणासोबतच त्यांची ऊर्जा, हावभाव यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. यानंतर रूपक तालात सात मात्रा, धमार तालमध्ये १४ मात्रा, २ स्वरचित रचना, चक्रधार पढंत त्यांनी सादर केल्या. धीरगंभीर अशा 'श्रीराम कथा' सादरीकरणाने त्यांनी आपल्या प्रस्तुतीचा समारोप केला. त्यांना झुबेर शेख (सतार) , पं. कालिदास मिश्रा (तबला) वैभव मानकर (हार्मोनियम व गायन), वैभव कृष्ण (पढंत) , भुवन (बासरी) यांनी साथ केली. त्यांचे दर्शन आणि त्यांची सौंदर्य प्रस्तुती अतिशय देखणी होती. आर्य संगीत प्रसारक मंडळाच्यावतीने आयोजित ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या समारोपाच्या सत्रात किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वर योगिनी डॉ. प्रभा अत्रे यांनी स्वरमंचावरून श्रोत्यांशी संवाद साधला. भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रचारात सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे मोठे योगदान आहे, असेही त्यांनी सांगत त्यांनी राग भैरवीने आपल्या गायनाची सुरुवात केली. त्यामध्ये तराणा व 'जागी मै सारी रैन', 'जगत जननी भवतारी मोहिनी तू नवदुर्गा...' ठुमरी सादर केली. त्यांना सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), माधव मोडक (तबला), आरती ठाकूर - कुंडलकर, आश्र्विनी मोडक (तानपुरा), डॉ.चेतना बनावट व अतींद्र तरवडीकर (गायन) यांनी साथ केली. महोत्सवाच्या परंपरेप्रमाणे सवाई गंधर्व यांच्या 'बिन देखे पडे नही चैन' या भैरवीचे रेकॉर्डींग ऐकून ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता करण्यात आली. कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी आणि सारे पदाधिकारी यांनी पाच दिवस सुरू ठेवलेला स्वरयज्ञ उत्तम रित्या रसिक आणि कलावंतांच्या सहभागाने उत्तम साजरा झाला. - सुभाष इनामदार. पुणे subhashinamdar@gmail.com